नेटफ्लीक्सवर सध्या ‘खाकी: द बेंगाल चाप्टर’ नावाची वेबसिरीज सुरू आहे. करप्ट राजकारणी स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी गुंडांना पाळतात आणि त्यांच्या करवी वाट्टेल ती काम करून घेत्तात. राजकारणी अगदी लहानपणापासून मुलांना हेरून त्यांचा ‘सांभाळ’ करून पुढे जाऊन त्यांचा गुंड म्हणून वापर करून घेतात. मुलांना खायला, प्यायला आणि दादागिरी करायला राजकारणी स्पेस तयार करून देतात. त्यात राजकारणी अगदी छोट्या छोट्या वसुलीपासून ते अवयव तस्करी पर्यंतच्या सगळ्या गैरधंद्यामध्ये या गुंडाकरवी पैसे कमवतात. सत्ता काबीज करतात. मग सुरू होतो, पोलीस आणि गुंडांचा थरार! शेवटी नाहक बळी जातो तो त्या गुंडांचा ज्यांना राजकारणी यांनी खोटी स्वप्न दाखवली असतात. राजकारणी राहतात नामानिराळे, एक गुंड ग्यांग पोलिसांनी संपवली कि दुसरी तयार करायला ते मोकळे.
या वेबसिरीजची आठवण झाली, जेव्हा पुण्यामधल्या वस्ती-युवकांची सद्यपरिस्थिती सीवायडीए मधली अंकिता या होतकरू स्टाफकडून जाणून घेताना. खाकी वेबसिरीजचा काळ आहे तो १९९० मधला, पण २०२५ सालातही तेव्हाची परिस्थिती अगदी चपखल किंबहुना आणखी विदारक झालेली वाटते.
सीवायडीए संस्था पुण्यातल्या नागरी वस्त्यांमध्ये ‘ -वस्त्यांमध्ये युथ फॉर चेंज या प्रक्रियेच्या माध्यमातून तिथल्या युवकांबरोबर काम करते, त्यात त्यांचे शिक्षण, रोजगार, व्यवसाय स्कील डेव्हलपमेंट सारखे उपक्रम राबविते. मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून अंकिताबरोबर चर्चा झाली असता, युवकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसे बिघडत चालले आहे? याची एक प्रचीती आली. वस्तीमध्ये राहून कळत-नकळतपणे सध्याची लहानमुले युवक होईपर्यंत कसे गुन्हेगारी, व्यसनाधीनातेच्या दुष्टचक्रात अडकतात आणि आयुष्य उध्वस्त करून घेतात याचा अंदाज आला.
या सगळ्याची सुरुवात होते ती शालेय शिक्षणापासून. घरात मुलांकडे बघायला आई-वडील अथवा एकल पालक (आई किंवा वडील) यांना हातावरच पोट असल्याने वेळ नसतो. त्याला जोड मिळते ती वस्तीतल्या वातावरणाची, डोळ्यासमोर रोल मॉडेल नसल्याने, आयुष्यात काय करायचं? याची दिशा देणार कुणी नसल्याने आणि मुख्य म्हणजे मोबाईलमधल्या सोशल मिडियावरचा चुकीचा प्रभाव मुलांवर पडल्याने ती भरकटायला सुरू होतात. शाळा शिकून काय होणार आहे? शिकून कोणाच भलं झालं आहे? साधी नोकरी करून किती पैसा मिळणार? नोकरीतून ऐश करण्याइतका थोडीच पैसा मिळतो? झटपट पैसा कमवायचा असेल जुगाड करावा पाहिजे? काहीतरी झोल करायला पाहिजे? अशी मानसिकता तयार व्हायला लागते.
त्याला खतपाणी मिळत ते समाजातल्या सगळ्या घटकांकडून, एकतर आहे मित्रसंगत. ज्यात लहानमुल मोठ्या मुलांच्या नादी लागतात, मोठी मुलं त्याना खायची-प्यायची चटक लावतात. हळूहळू छोटी छोटी काम देऊन त्यात मिळणा-या पैशात मजा कशी करायची हे ते पद्धतशीरपणे शिकवतात. मग हळूहळू मोठी मुलं त्यांना आपल्या ग्रुपमध्ये शामिल करून घेतात. त्याला वस्तीमध्ये ‘कंपनी’ म्हटल जातं. मग अशा वेगवेगळ्या कंपन्या वस्तीमध्ये तयार होऊ लागतात. झटपट पैसा, खाण-पिणं, वाट्टेल ती मजा करायची सवय लागते. मुलं दिवसभर शाळा सोडून कंपनीच्या अड्ड्यावर पडीक असतात, तिथे दारू, गांजा, चरस, अशी सगळ्या प्रकारच्या अंमलीपदार्थांची रेलचेल असते. जेवण, पत्ते, कॅरम, जुगार या सगळ्या गोष्टी तर असतातच. आणि एकदा का याची लथ लागली की जाळ्यात आलेली मुले कुठं जात नाहीत.
मग प्रश्न पडतो, हे सगळं करायला मुलांकडे पैसा येतो कुठून? इथे आपले राजकारणी पिक्चरमध्ये येतात. मुलांच्या कंपनीला वेगवेगळ्या कामाच्या सुपा-या द्यायच्या, जसे की, पैसे वसूल करणे, अंमलीपदार्थांचा धंदा करणे, हाफ-मर्डर करणे इत्यादी. यात एक मेख अशी आहे, लहान मुलांनी खून-मर्डर केला तर त्याना जेल होत नाही. त्यांना सुधारगृहात पाठवले जाते. याचा फायदा घेऊन मुलांना या गुन्ह्यात आणलं जातं. अचानक लाखो रुपये दिसायला आणि मिळायला लागले की मुलांना कोणत्याही कामाचं/सुपारीच काही वाटत नाही. हे सगळं होत असताना आई-वडील कसे शांत बसतात? किंवा कुठे असतात?
एकदा एका मुलाने अंकिताला हे सगळं गणित समजून सांगितलं. तो म्हणाला, “दीदी हे बघ, मी शिकलो आणि नोकरी केली तर मला महिन्याला जास्तीत जास्त १५-२० हजार रुपये मिळतील. आई-वडील नसल्याने या पगारातच मला घर चालवायच आहे, माझा छोट्या भावा-बहीणच बघायचं आहे. मोठ्या बहीणच लग्न करायला मला कमीत कमी ८-१० लाख रुपये लागतील. या पगार मला १० वर्ष तरी नोकरी करायला लागल. आता जर कंपनीकडून मला सुपारी मिळाली तर खटदिशीनी मला लाखात पैसे मिळतील. आणि पोलिसांना पण सेट केलं जात. या नेत्यांचे हात लई वर पर्यंत पोचतात. लई आरडाओरडा झाला तर पोलीस जेलमध्ये टाकतात, मग घरची सगळी जबाबदारी ज्यांनी सुपारी दिली तो घेतो. मी जोपर्यंत आत राहतो तो पर्यंत माझा घरी दरमहिना पैसे पोच होतात. मला कसली चिंता राहत नाही. माझं रेकोर्ड खराब होतं पण त्यानी आयुष्यात काई फरक पडत नाही. आमच्या वस्तीत आणि आयुष्यात वेगळ काई होणार नाही. मरणाची पण भीती वाटत नाही, मजा एवढी करतो आम्ही त्यामुळे अजून काय वेगळ जगायचं आता. लोक मजाच करण्यासाठी मरमर करतात, आम्ही ती हे काम करून करतो. त्यामुळे तुम्ही वस्तीत येऊन जे काय करता ते पोरांच्या चांगल्यासाठी करता पण इथ सुधारायच कोणाला आहे. हे असंच चालू राहणार.”
हे सगळं ऐकून सुन्न झालं. वस्तीमध्ये मुलांच्या मानसिक आरोग्य काम करण्यासाठीची चर्चा इथे येऊन पोचली. व्यक्तीचं फक्त आरोग्य असं वेगळ काढता येत नाही हे पुन्हा प्रत्ययास आलं. सीवायडीएचे युवा संसाधन केंद्र (Youth Resource Centre) ची आणि कौस्तुभ, अंकिता, काजल सारख्या युवांची खरी गरज या वस्त्यांमध्ये आहे.